तुका म्हणे धनधनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥१॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥
जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥
सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥३॥
तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥
वित्त, सत्ता, प्रसिद्धी या सर्व बाबी माणसाला समाजात मान्यता मिळवून देतात. पण आपण ज्यांना आपले मानतो त्यांच्या बाबतीतही याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात हा वेदना देणारा अनुभव तुकाराम या अभंगातून सांगतात. कदाचित तो त्यांचा व्यक्तिगत अनुभवही असू शकेल. कारण सुरवातीला सुरळीत चाललेला त्यांचा व्यवसाय दुष्काळाने डबघाईस आणला होता. या अभंगातली शेवटची ओळ ज्याला कळली त्याला अध्यात्मात आणखी काही शिकण्यासारखे राहिलेले नाही असे खुशाल समजावे. ज्या पैशासाठी आपण येवढा आटापिटा करतो तो नशिबात असला तरच आणि तेवढाच मिळतो तोही कधी, कसा जाईल याचा नेम नाही.
लक्ष्मीस्तोय तरंगभंग चपलः
पाण्याच्या लाटेप्रमाणे चंचल असलेल्या लक्ष्मीचा काय भरवसा?
लेबल: abhang