Abhang Remix
Wednesday, June 24, 2009
अभंग आस्वाद - १६
नका मजपाशीं | वदो प्रपंचाचे विशीं नका मजपाशीं | वदो प्रपंचाचे विशीं ||१||
आतां नाइकावी कानीं | मज देवाविण वाणी ||ध्रु.||
येऊनियां रूपा | कोण पाहे पुण्यपापा ||२||
मागे आजिवरी | जालें माप नेलें चोरी ||३||
सांडियेलीं पानें | पुढें पिका अवलोकन ||४||
पडों नेदी तुका | आड गुंपूं कांहीं चुका ||५||
प्रपंचाच्या गप्पांचा आणि गॉसिपचा अगदी वीट आला की लोकांना हात जोडून नम्रपणे विनंती करा की आता पुरे. मला आता यात रस नाही. भगवंताचे गूण तुम्हाला गाता येत असतील तर गा, नाहीतर गप्प बसा, माझे कान शिणवू नका, तुमचे चालू द्या. पण लोकांना एकटं करमत नाही, ते मलाही त्यांच्यात "सामील" करू पाहातात. त्यांचा हेतू काही वाईट नसतो, पण त्यांना काय माहिती मी आता त्यांच्यातला राहिलेलो नाही? माझा क्लास आता वेगळा आहे?
लेबले: abhang, tukaram
Friday, August 01, 2008
अभंग आस्वाद - १५
ऐसे संत जाले कळींऐसे संत जाले कळीं। तोंडीं तमाखूची नळी ॥१॥
स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥
भांगभुर्का हें साधन । पची पडे मद्यपान ॥२॥
तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥
आम्ही संत म्हणजे आम्ही कोणी वेगळे वा मोठे असा आव आणणारे ते संत कसे असू शकतात? व्यसन केले पण ते पचवले म्हणून संतपदवी मिळत नाही. लोकसंग्रहाने देखील देव बनता येत नाही. लोकांना रोगमुक्त करून त्यांचा दुवा घेता येईल पण त्यांना देवाकडे नेता येणार नाही. ईश्वराशी जवळीक ही संतांची ओळख. सध्याच्या संतांचे लक्षण तुकारामांनी वर केलेच आहे!
लेबले: abhang, tukaram
Sunday, May 25, 2008
अभंग आस्वाद - १४
हिरा ठेवितां ऐरणीं हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥1॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा होय तोचि अंगें। सूत न जळे ज्याचे संगें ॥2॥
तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥3॥
हिरा ऐरणीवर ठेवून त्याच्यावर घणाचे घाव घातल्यावरही जर तो फुटला नाही तरच त्याला मोल येते. खोट्या हिऱ्याचा चुरा होतो. संकटात माणसाची खरी पारख होते. क्रूषापासून येशू ख्रिस्तापर्यंत आणि मोहम्मदापासून ते तुकारामांपर्यंत सर्व संतांना जगाच्या विरोधाचा सामना करावा लागला. पण मोहरिला गुंडाळलेले सुत जसे जळत नाही, तसे ईश्वराशी जवळीक साधलेले हे संत सुखरूप राहतात.
लेबले: abhang, tukaram
Sunday, May 04, 2008
अभंग आस्वाद - १३
तुका म्हणे धनधनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥१॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥
जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥
सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥३॥
तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥
वित्त, सत्ता, प्रसिद्धी या सर्व बाबी माणसाला समाजात मान्यता मिळवून देतात. पण आपण ज्यांना आपले मानतो त्यांच्या बाबतीतही याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात हा वेदना देणारा अनुभव तुकाराम या अभंगातून सांगतात. कदाचित तो त्यांचा व्यक्तिगत अनुभवही असू शकेल. कारण सुरवातीला सुरळीत चाललेला त्यांचा व्यवसाय दुष्काळाने डबघाईस आणला होता. या अभंगातली शेवटची ओळ ज्याला कळली त्याला अध्यात्मात आणखी काही शिकण्यासारखे राहिलेले नाही असे खुशाल समजावे. ज्या पैशासाठी आपण येवढा आटापिटा करतो तो नशिबात असला तरच आणि तेवढाच मिळतो तोही कधी, कसा जाईल याचा नेम नाही.
लक्ष्मीस्तोय तरंगभंग चपलः
पाण्याच्या लाटेप्रमाणे चंचल असलेल्या लक्ष्मीचा काय भरवसा?
लेबले: abhang
Friday, February 29, 2008
अभंग आस्वाद - १२
उजळला दीप गुरुकृपा जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥१॥
रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेसी ॥२॥
फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥३॥
दिली तिळीजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥४॥
तुका म्हणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥
प्रेमात पागल झालेल्या प्रियकराला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जसे प्रेयसीच दिसते तसे भक्तित बुडालेल्या तुकारामांना अंत्ययात्रा देखील ईश्वराकडे नेणारी भक्तियात्राच वाटली तर नवल नाही. ईश्वराशी तादात्म्य पावल्यामुळे शरीराचा भाव प्रेतरूप झाल्यासारखा, आता आपले हक्काचे झाड गेले म्हणून रडणार्या काम, क्रोध, मायारूपी कैदाशिणी, तर आपला हात साफ करण्याची संधी गेली म्हणून हबकलेला यम! कडक उन्हात वाळलेल्या वैराग्यरूपी शेणी असल्यावर ज्ञानरुपी अग्नि जीवित्वाच्या आसेला आपल्या कवेत किती सहजतेने सामावून घेतो? आशा, आकांक्षेचे घट प्रदक्षिणा करवून एकदा का फोडून टाकले की 'अहं ब्रम्हास्मि' व 'तत्वम् असि' या महावाक्यांची बोंब मारायला मोकळे. कुळ, नाम व रूपाची ही तिलांजली देऊन शरीर ईश्वरास समर्पित केले की मनातल्या ऐहिकतेची रक्षा झालीच म्हणून समजा. आता एका कोपर्यात गुरुकृपेचा दीप जणू काही झालेच नाही, इथे काही नव्हतेच तर होणार काय? अशा थाटात शांतपणे तेवत आहे!
अभंग आस्वाद - ११
माकडें मुठीं धरिलें फुटाणे माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
पुर्वीच्या काळी माकडे पकडण्यासाठी एका मडक्यात काही खाण्याचे पदार्थ टाकून ते जमिनीत पुरुन ठेवत असत. माकडे ते खाण्यासाठी त्यात हात घालत. हाताची मूठ मिटल्यामुळे हात बाहेर निघत नसे व ते पकडले जाई. पण त्या मूर्ख माकडाला हे कळत नसे की आपण जशी मूठ मिटली तशी मूठ उघडली तर आपला हात आपोआप बाहेर येईल! पण त्याला तरी का दोष द्यावा? तो तर शेवटी पशू आहे. (माणसाचे काय?) पोपट पकडण्यासाठी देखील अशीच एक सोपी युक्ती केली जाई. एक नळी तारेला बांधून ठेवत. पोपट त्यावर बसला की ती त्याच्याच वजनाने गोल गोल फिरू लागे. ही नळी सोडली तर आपण खाली पडू या भितीने तो ती नळी घट्ट धरून ठेवी व पकडला जाई. जनसामांन्यांना परिचीत असलेली ही उदाहरणे देऊन तुकारामांनी किती सोप्या पद्धतीने माणसाला "सोडायचा" उपदेश केला आहे?
अभंग आस्वाद - १०
तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥
तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राम्हणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥
तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥२॥
तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईंचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥३॥
तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं ॥४॥
जोवर खर्या शक्तीची ओळख होत नाही तोवर कोणीही भाव खाऊन जातो. तसे खर्या संताचे दर्शन होत नाही तोवर माळामुद्रांची चलती असते. वैराग्याच्या आणि शूरत्वाच्या गोष्टी सुंदर स्त्री अथवा पराक्रमी पुरुष भेटेपर्यंतच!
Tuesday, December 04, 2007
अभंग आस्वाद - ९
ढाल तलवारें गुंतले हे करढालतलवारे गुंतले हे कर । ह्मणे जुंझणार कैसा जुंझे ॥1॥
पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥
बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥2॥
असोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हायहाय काय करूं ॥3॥
तुका ह्मणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥4॥
साध्य साधण्यासाठी साधनाचा उपयोग करून घ्यायला ते साधन कसे वापरायचे याचे तर ज्ञान पाहिजे ना? नाहीतर तुकाराम महाराजांनी वर सांगितलेली अवस्था व्हायची. मला एका हातात ढाल तर दुस-या हातात तलवार दिलीत, आता मी लढू कोणत्या हाताने? घोड्यावर बसविलेत? वा! आता युद्धाची धावपळ कशी करणार?
तुझे आहे तुजपाशी, हेच खरे नव्हे का? तुझे सत्त्व तुझ्याजवळ असले तर साध्य साधण्यासाठी लागणारे साधन सहज उभे करता येते. ही गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या कथेवरून स्पष्ट होत नाही का? रावणाची लंका जिंकायची, त्यासाठी समुद्र चालत पार करायचा. इतक्या मोठ्या सैन्याशी वानरांच्या सहाय्याने लढायचे, हे सर्व काय सोपे होते? त्यासाठी लागणारी साधनसंपत्ती रामाने स्वतःच्या सत्त्वाच्या बळावर उभी केली.
विजेतव्या लङ्का चरणतरणीया जलनिधिः
विपक्षः पौलस्त्यो रणभुवि सहायाश्च कपयः।
तथाप्येको रामः सकलमवधीद्राक्षसकुलम्
क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे॥
लेबले: abhang
Sunday, October 21, 2007
अभंग आस्वाद - ८
अवघा तो शकुन
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥ १ ॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥
संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥
मुहुर्ताचे मोल तुकाराम महाराजांना कमी करायचे नाही पण हरीभक्तांना सर्वच काळ शुभ व सगळ्याच दिशाही शुभ आहेत असे सांगुन त्यांनी मोठ्या कौशल्याने समाजातील बाह्य अवडंबर कमी केले. श्रद्धेवर आघात न करता भक्तिचाच उपयोग करून धर्मात शिरलेली गतानुगतिकता त्यांनी यशस्वीपणे कमी करून दाखवली व हेच वारकरी संप्रदायाचे सामुदायिक यश आहे असे मला वाटते.
लेबले: abhang, tukaram
Archives
July 2004
October 2004
December 2005
January 2006
May 2007
June 2007
July 2007
October 2007
December 2007
February 2008
May 2008
August 2008
June 2009
