Abhang Remix

मंगळवार, जून १२, २००७

 

अभंग आस्वाद - ४

संताचे वचनीं मानितां विश्वास
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥1॥
न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥
बैसलिये ठायी म्हणता रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥2॥
संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥3॥
खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥4॥
तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणिक ते आटी न लगे कांहीं ॥5॥

प्रत्येक ठिकाणी बुद्धिप्रामाण्यवाद काय करायचा? तुकारामादी संतांवर विश्वास ठेवायला काहीच खर्च येत नाही. मग एक चान्स तर घेऊन बघा की राव. तोटा तर काहीच नाही, झाला तर फायदाच! एक वाणी यापेक्षा चांगला सल्ला तो काय देणार? बसल्याजागी रामराम म्हणून पाहा, परनारी मातेसमान तर परद्रव्य विष्ठेसमान मानून पाहा, खरे बोलून तर पाहा देव मोफत जोडला जातो आपल्या आयुष्याशी कायमचा!

लेबल: ,


posted by shantanu  # ११:०० PM

रविवार, जून १०, २००७

 

अभंग आस्वाद - ३

करितां चिंतन विठोबाचें

न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥1॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥2॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥3॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर ह्मणतां वाचे ॥4॥
तुका ह्मणे आस जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥5॥

विषयांचे चिंतन करून काय मिळते? द्रव्य, दारेचे चिंतन करून काय त्या गोष्टी मिळतात का? पण विठोबाचे चिंतन केल्यास मात्र तो प्रत्यक्ष भेटायला येतो असा विश्वास तुकाराम देतात. द्रौपदीला नाही का चिंतनमात्रे कृष्णाने वस्त्रे पुरवली? १००% निष्ठेने आपली आस विषयांकडून ईश्वराकडे वळवली तर भवसागर तरून जाल असे ते म्हणतात.

लेबल: ,


posted by shantanu  # १०:२४ AM

शनिवार, जून ०९, २००७

 

अभंग आस्वाद - २

फुटती तरुवर उष्णकाळमासीं
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥1॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥2॥
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥3॥
तुका ह्मणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥4॥

या दीड वीत पोटाच्या काळजीने इतके हातघाईवर का येता बरे? जन्माला घातले तेव्हा देवाने दुधाची सोय केली होती की नाही? पशू, पक्ष्यांची काळजी देव करतोच की! मग माणूसच का इतका घाबरून राहतो बरं? उन्हाळ्यात कोणीही पाणी घालत नसताना झाडांना पालवी फुटते हा ईश्वराचा चमत्कारच आहे. विश्वंभराचे ध्यान करा, नाम घ्या आणि चिंतामुक्त व्हा हाच तुकारामांचा संदेश आहे.

लेबल: ,


posted by shantanu  # ९:५३ PM

Archives

जुलै 2004   ऑक्टोबर 2004   डिसेंबर 2005   जानेवारी 2006   मे 2007   जून 2007   जुलै 2007   ऑक्टोबर 2007   डिसेंबर 2007   फेब्रुवारी 2008   मे 2008   ऑगस्ट 2008   जून 2009   डिसेंबर 2009   एप्रिल 2010   ऑक्टोबर 2010   नोव्हेंबर 2014   एप्रिल 2015  

This page is powered by Blogger. Isn't yours?